सातारा (प्रतिनिधी) – गावातील काही समाजकंटकांनी जातीचा दाखला पळवून नेल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भरलेला उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी चिखली, ता. सातारा येथील वंदना खेत्रू झुंजार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
त्या म्हणाल्या, ग्रामपंचायत निवडणुकीत माझा उमेदवारी अर्ज बाद व्हावा, म्हणून गावातील भिवराम अर्जुन शिर्के व जगन्नाथ धोंडिबा शिर्के यांनी माझा इतर मागास प्रवर्गतील जातीचा दाखला जाणीवपूर्वक लपवून ठेवला.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी संबधितांनी हे कृत्य केले. 31 डिसेंबर रोजी हा दाखला आम्ही आणून देऊ, असे आश्वासन त्यांनी सातारा तालुका पोलिसांनी दिले होते; परंतु त्यांनी तो दाखला शेवटपर्यंत दिला नाही.
या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.