मुंबई -कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर विशेष भाग अडचणीत सापडलेला आहे. मॅगेसेसे पुरस्कार विजेते बेजवाद विल्सन आणि क्राइम पेट्रोलचे होस्ट अनुप सोनी यात सहभागी झाले होते. त्यात अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नावरून हिंदुंच्या भावना दुखवल्याची फिर्याद भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने नोंदवली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी ही फिर्याद दाखल केली. लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे ही फिर्याद दाखल करण्यात आली. बच्चन यांनी हिंदू धर्मीयांच्या भावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच बुद्ध आणि हिंदूधर्मीय गुण्यागोविंदाने राहात असताना त्यांच्यात संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे ट्विट त्यांनी आपल्या दोन पानी अर्जासह केले आहे. सहा लाख 40 हजार रुपयांसाठी विचारला गेलेला हा प्रश्न होता…
25 डिसेंबर 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले? पर्याय आहेत ए-विष्णूपुराण, बी- भगवद्गीता, सी- ऋग्वेद, डी – मनुस्मृती. विल्सन यांनी या प्रश्नाचे उत्तर मनुस्मृती असे बरोबर दिले.
त्यानंतर बच्चन म्हणाले, 1927 मध्ये प्राचीन हिंदू धर्मग्रंथ मनुस्मृतीने जातिभेद आणि अस्पृश्यतेचा पुरस्कार केला होता. त्याचा निषेध करत त्याच्या प्रतींचे दहन केले होते. त्यानंतर समाज माध्यमांवरही ट्रोधाडांनी कौन बनेगा करोडपतीवर बहिष्काराची मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला.