जामखेड – शालेय जीवनातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी दत्तवाडी शाळेने आयोजित केलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर हे शैक्षणिकदृष्ट्या ऐतिहासिक ठरेल, असे गौरवोद्गार समारोपप्रसंगी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी काढले.
तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि. प. प्रा. शाळा दत्तवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शिबिरात धोंडपारगावसह पाडळी, नान्नज, उहेवस्ती, सारोळा, पिंपळगाव आळवा, जामखेड, बसरवाडी, धानोरा, हाळगाव यासह 17 विविध शाळांतील एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात पुणे, संगमनेर, राहुरी, गेवराई, आष्टी, उस्मानाबाद, सांगोला इ. ठिकाणी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कार्य केलेल्या एकूण 13 तज्ज्ञांनी घटकनिहाय सविस्तर मार्गदर्शन केले, तर सातारा व चंद्रपूर येथील सैनिक स्कूलमधील विद्यार्थी श्रेयस वाघमारे व अथर्व देशमुख यांच्या प्रेरणादायी प्रकट मुलाखती संपन्न झाल्या.
धोंडपारगावमधील ग्रामस्थांनी प्रत्येक कुटुंबात शिबिरासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्थाकरून एक नवा आदर्श निर्माण केला. सर्व शिबिरार्थी, त्यांचे पालक व वर्गशिक्षक यांनी दिवाळीच्या सुट्टीत देखील या शिबिरासाठी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल अरणगाव व हाळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश कुंभार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच नान्नज बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी निळकंठ घायतडक यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत शिबिरातील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरव करण्याचे जाहीर केले.
यावेळी भागवत आढाव, आश्लेषा दोशी, ओम ढवळे, ओंकारराजे जायभाय व वैष्णवी मुळे या विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव कथन केले. यावेळी त्यांनी आमच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासात व सकारात्मक विचारांचे बीजारोपण करण्यात या शिबिराचा आम्हाला नक्की फायदा होईल, असे सांगितले. शिबीर कालावधीत राहता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, शिक्षक नेते राम निकम, केंद्रप्रमुख सुनील बुद्धीवंत, लक्ष्मीकांत देशमुख व संजय गीते यांच्याह अनेक शिक्षक बांधवांनी सदिच्छा भेटी देऊन मार्गदर्शन व सहकार्य केले. सदरच्या शिबिराचे आयोजन दत्तवाडी शाळेतील शिक्षक मनोहर इनामदार यांनी केले असून, शिबिराच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी सरोदे, बाळू जरांडे, विष्णू मोहळकर, गणेश नेटके, खंडू सोळंके यांनी परिश्रम घेतले.