महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर दिलीपराव वळसे पाटील यांच्या रूपाने उच्च आणि तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अर्थ, ऊर्जा, विधानसभेचे अध्यक्ष इत्यादी महत्त्वाची मंत्रिपदे यशस्वीपणे सांभाळून त्या खात्यांना न्याय दिला आहे. कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री म्हणून सध्या ते कार्यरत आहे. आंबेगाव शिरूरकरांचे ऊर आनंदाने भरून गेले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन, कमी बोलणे, अभ्यासू स्वभाव, संयमी, नाते जोडण्याची वृत्ती, अलौकिक बुद्धिमत्ता या बाबींमुळे मंत्री दिलीपराव वळसे पाटील उभ्या महाराष्ट्रात दीपस्तंभासारखे उभे आहेत.
– गुलाबराव धुमाळ, उद्योजक मोराची चिंचोली
झाले बहु होतील बहु; परंतु मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे सहकार, शेती, दुग्धव्यवसाय, शिक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान क्षेत्राचा परिसस्पर्श असणारे एकमेवाद्वितीय तेच. असामान्य जीव मात्र अनेक वर्षांनंतरही इतिहासाच्या स्मरणात ताजे टवटवीत राहतात आणि भविष्यात इतरांना मार्गदर्शन करतात. समाज घडवतात, असे एक कर्तृत्ववान नेतृत्व मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आज वाढदिवस. मंत्री वळसे पाटलांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरगुडसर या खेडेगावात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सायनच्या रुईया महाविद्यालयात झाले.
चर्चगेटच्या शासकीय महाविद्यालयातून एलएल.बी आणि मुंबई विद्यापीठाची एलएलएम पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युुनिकेशनमधून वृत्तपत्रविद्येची पदवी मिळवली. त्याचा पक्षसंघटनेत पुढे उपयोग झाला. विरोधकांची सत्ता असतानाही दिलीपराव वळसे पाटील, आर. आर. पाटील यांना एकाच राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित केले गेले. हीच भविष्यातील वाटचालीची नांदी ठरली.
साहेबांनी राज्यात काम करीत असताना आपला मतदारसंघ असलेल्या आंबेगाव तालुक्यात हरितक्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणली. तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवून आणला. अवसरी येथे शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. यामुळे पूर्ण राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येऊ लागले आहेत. अवघ्या दहा महिन्यांत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा करून साखरसम्राटांपुढे आदर्श उदाहरण ठेवले. तालुक्यात शरद बॅंक, बाजार समिती, भीमाशंकर कारखाना, खरेदी-विक्री संघ या संस्थांना प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे काम केले.
आंबेगाव तालुक्यात दुग्धव्यवसाय गोवर्धन दूध प्रकल्प, अवसरी दूध शीतकरण केंद्र आणि अन्य प्रकल्पांमुळे भरभराटीला आला. त्यामुळे तालुक्यात रोजगार निर्मितीलाही वाव मिळाला. सत्तेवर नसतानाही विकास कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आंबेगाव शिरूर मतदारसंघात पाहावयास मिळते. आंबेगावप्रमाणेच शिरूरचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. त्यांच्या कामाचा आवाका पाहून शिरूरकर जनता खूश आहे. तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील एकही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये किंवा त्याला अन्य कारणासाठी संधी नाकारली जाऊ नये.
तसेच प्रवेशप्रक्रिया पारदर्शक असावी. यासाठी केंद्र ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. विधानसभेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर तेथेही त्यांनी पदाला साजेसे काम करून दाखवले. आमदारांना शिस्त लावून विधानभवनाचे पावित्र्य राखण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेत गदारोळ न होता जास्तीत जास्त वेळ प्रश्नांची मांडणी, चर्चा, विधायक निर्णय घेण्यात घालविण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. विधानसभेला 75 वर्षे पूर्ण झाल्याने राज्यात अमृतमहोत्सवी कार्यक्रम घेतले.
विधानसभेचे महत्त्व लोकांपर्यंत जावे. यासाठी विशेष प्रयत्न केले. राजकारण्यांमध्ये ज्या मोजक्या लोकांना समाजकार्याची उत्तम जाण आहे. समस्या समजून त्यावर उपाय शोधायची समज आहे. त्यामध्ये वळसे पाटलांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. विषयाची उत्तम समज, प्रश्नांची नेमकी जाण, समजावून सांगण्याची हातोटी व कृतिशीलता ही त्यांची स्वभाववैशिष्ट्य आहेत. म्हणूनच सध्याच्या आणि भावी महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत मंत्री वळसे पाटील नाव आघाडीवर असणार आहे.