बंगलुरू – बंगलुरू शहरासह कर्नाटकाच्या अनेक भागाला तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे बंगलुरूमधील अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पुरग्रस्त कुटुंबाला राज्य सरकारने 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ही घोषणा करताना बंगलुरू शहरात ज्या अतिक्रमणांमुळे ही पुरस्थिती ओढवली आहे ती अतिक्रमणे कठोरपणे काढून टाकली जातील असेही जाहीर केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बंगलुरू जवळील होसाकेरेहल्ली भागाला भेट देऊन पहाणी केली त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, या पावसात सुमारे सहाशे ते सातशे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी नंतर महापालिका अधिकाऱ्यांसमवेत एक आढावा बैठक घेऊन बंगलुरू शहरातील पूरस्थितीचा आढावा घेतला.
बंगलुरू शहरात येत्या दोन दिवसांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे अशी सूचनाही येडियुरप्पा यांनी केली आहे. शहरात पाणी साचू नये म्हणून वाहत्या पाण्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे शोधून त्यावर कठोर कारवाई करावी व ही अतिक्रमणे काढून टाकावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.