पोलिसांनी विधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल केलेले 36 अर्ज काढले निकाली
पुणे – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने गुन्ह्यातील पीडित मुलींना नुकसान भरपाई देण्यात येते. या मनौधर्य योजनेंतर्गत आतापर्यंत 36 दाव्यांमध्ये एकूण 34 लाख 15 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणातर्फे नुकसानभरपाई मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेले सर्व म्हणजे 36 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. 28 पीडितांना तक्रार दाखल झाल्यानंतर अंतरिम मदत म्हणून प्रत्येकी 30 हजार असे मिळून एकूण आठ लाख 40 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. निकाल देण्यात आलेल्या आठ दाव्यांमध्ये 25 लाख 35 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. या आठ निकाली दाव्यांमध्ये दोन दाव्यांमधील पीडितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी दिली.
पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तिला नुकसानभरपाई देण्यात यावी म्हणून अर्ज केला जातो. तसेच संबंधित पीडित मुलीकडूनही नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज दाखल करता येतो. या अर्जाबरोबर कलम 164 नुसार नोंदविण्यात आलेल्या जबाबाची प्रत जोडावी लागते. विधी सेवा प्राधिकरणाकडे आलेल्या अर्जाची पडताळणी करून नुकसानभरपाईची रक्कम देण्यात येते. तसेच सुनावणी दरम्यान पीडित मुलगी फितूर झाल्यास तिला देण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम व्याजासह वसूल करण्याची तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे.
कलम 357 (अ) नुसार मिळते भरपाई
फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता कलम 357 (अ) नुसार ही नुकसानभरपाई देण्यात येते. गंभीर जखमी झाल्यास 50 हजार रुपये देण्यात येतात. अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी दोन हजार रुपये देण्यात येतात. बलात्काराचा दावा निकाली काढण्यात आल्यानंतर नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये देण्यात येतात. तक्रार दाखल झाल्यानंतर पीडितेला 30 हजार रुपये अंतरिम मदत म्हणून देण्यात आलेले असतात. त्यामुळे दाव्याचा निकाल लागल्यानंतर दोन लाख 70 हजार रुपये असे मिळून तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई मनोधैर्य योजनेअंतर्गत देण्यात येतात. पीडित मुलीवर झालेला अत्याचार आणि तिचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई या योजनेंतर्गत देण्यात येते.