महापालिका आयुक्त सौरभ राव यांची माहिती
पुणे – अवघ्या तीन तासांत कात्रज तलाव परिसरात झालेल्या 106 मि.मी. पावसामुळे आंबिल ओढा परिसराला पुराचा फटका बसला. यामध्ये 12 जण दगावले असून 61 जनावरेही मरण पावली आहेत. काही नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या असून, पोलीस त्यांचा तपास करत आहेत. 40 ठिकाणी भिंत पडल्याच्या घटना आहेत. पाच हजारांहून नागरिक बाधित झाले असून 3,500 नागरिकांचे स्थलांतर केल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
बाधितांचे पंचनामे करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे. बाधितांना शासकीय नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार असून, तूर्तास त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व सहकाऱ्यांसह बाधित परिसराची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याला सुरूवात केली आहे. ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये तसेच रस्त्यांवर गाळ आणि कचरा पसरला आहे. तो कचरा आणि गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
आंबिल ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे सर्व साहित्य वाहून गेले आहे. महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. उद्यापासून या वस्तूंचे वाटप करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात येईल. शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राव यांनी दिले.
वाहनांचा इन्शुरन्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न
महापुरामध्ये अनेक वाहने वाहून गेली. तसेच अनेक ठिकाणी बेसमेंटच्या पार्किंगमधील वाहने बुडाली आहे. बऱ्याचदा वाहनांमध्ये वाहनांची कागदपत्रेही ठेवलेली असतात. तीदेखील वाहून गेली असतील किंवा खराब झाली असतील, तर वाहनचालकांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवणे कठीण जाणार आहे. या वाहनांचेही पंचनामे केले जाणार आहेत. याच्या आधारावर विमा कंपनीने संबंधित वाहन मालकांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी बोलणार आहोत, असे राव यांनी सांगितले.
नाल्यांवर अतिक्रमणे झाली हे वास्तव
नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत, हे वास्तव आहे. याशिवाय सिमेंटचे रस्ते यामुळेही आपत्तीमध्ये भर पडत आहे, हे देखील वास्तव आहे. यासाठी लवकरच सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार असून, दिवाळीनंतर अतिक्रमण कारवाईला जोर देण्यात येईल, असेही सौरभ राव यांनी नमूद केले. अतिक्रमणांमुळे ओढे, नाल्यांचे प्रवाह बाधित झाल्याने बहुतांश ठिकाणी पाणी शिरले आहे. पावसाळा संपल्यानंतर या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.