नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव आता आर्थिक क्षेत्रावरही पडत असून करोनामुळे अनेक उद्योग व्यवसाय थंडावले आहेत. त्याचा फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांवरही पडला असून सरकारने त्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांची मदत केली पाहिजे अशी मागणी राज्यसभेत आज करण्यात आली. केरळ कॉंग्रेसचे सदस्य जोस मनी यांनी सांगितले की ऑटोमोबॉईल क्षेत्र, आयटी क्षेत्र अशा क्षेत्रांवर करोनामुळे मोठे संकट आले असून तेथील व्यवसाय बऱ्याच प्रमाणात ठप्प झाला आहे. अनेक उत्पादनांची विक्री आणि उत्पादन घटले आहे.
त्यामुळे छोटे व्यावसायिक, मजूर आणि विक्रेत्यांचे हाल सुरू झाले असून त्यांना कर्ज फेडण्यासाठीही पैसे मिळेनासे झाले आहेत. सरकारने दहा लाखांच्या आतील कर्जावर पुढील सहा महिने व्याज माफी दिली पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली. द्रमुकचे षणमुगम म्हणाले की अशोक लेलॅंड, टीव्हीएस मोटर्स अशा मोठ्या कंपन्यांनीहीं आपले कारखाने बंद ठेऊन कामगारांना सुट्टी दिली आहे. ते म्हणाले की सरकार जर उद्योगपतींची कर्जे माफ करू शकते तर मोलमजुरी करणाऱ्या ज्या लोकांचा रोजगार बुडाला आहे त्यांनाही सरकारने मदत केली पाहिजे. कॉंग्रेसचे विपलोव ठाकूर म्हणाले की करोनामुळे हिमाचल प्रदेशचा पर्यटन व्यवसाय आणि हॉटेल व्यवसायही पुर्ण मोडकळीला आला आहे. त्यांनाही मदतीची गरज आहे.