वाघोली -अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हवेली तालुका भाजपाच्या वतीने हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे यांनी दिली.
राज्यात पावसाळा सुरू होऊन आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पेरण्या वाया जातील, अशी चिन्हं आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पॉलिहाऊसचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे त्वरित करावेत. बॅंकेचे हप्ते पुढील दोन वर्षांकरिता थांबवावेत, अशी मागणी केली.
यावेळी भाजप हवेलीचे अध्यक्ष सुनील कांचन, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, सुदर्शन चौधरी, चित्तरंजन गायकवाड, जयप्रकाश सातव व पदाधिकारी उपस्थित होते.