पाटण (प्रतिनिधी) – गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पाटण तालुक्यात अतिवृष्टी व कोयना धरण व्यवस्थापनाच्या नियोजन शुन्य कारभाराने शेतकरी, व्यापारी, नागरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीची नुकसान भरपाई काही लोकांना मिळाली आहे. मात्र अद्याप साडेतीन तीन हजार नुकसानग्रस्त हे नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत भरपाई द्या, अन्यथा दि. 25 मे पासून उपोषणाला प्रारंभ करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजीउपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जुलै ते नोव्हेंबर 2019 दरम्यान पाटण तालुक्यात अतिवृष्टी व कोयना धरण व्यवस्थापनाच्या नियोजन शुन्य कारभाराने धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकरी, व्यापारी, नागरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या वाहून गेलेले शेतीपंप, मुजलेल्या विहिरी, नदीकाठचे प्रवाहमुळे वाहून गेलेल्या जमिनी तसेच खरीप हंगामातील पिके यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई काही अल्पशा शेतकऱ्यांना मिळाली आहे. मात्र, अद्याप पाटण तालुक्यातील साडेतीन हजार शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. शासनाचा यात भेदभाव करण्याचा उद्देश आहे का? लोकशाहीत सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार आहेत. आजपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये प्रलंबित असणारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पंचनामे दहा महिन्यांपासून धुळ खात का पडले आहेत? असा सवाल निवदेनात करण्यात आला आहे. तातडीने मदत मिळाली नाही तर खरीप हंगामाला कसे सामोरे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्याचे निवेदनात म्हटले आहे.