भाजपच्या पुस्तक प्रकाशनानंतर सोशल मीडियावर संताप
तत्काळ बंदी घालण्याची मागणी
नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणीसह सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे.
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात एका कार्यक्रमात पार पडला. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते.
दरम्यान, दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन केले होते. पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्यानंतर जय भगवान गोयल यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही.
“आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’, हे मनाला पटत नाही, असे ट्वीट आव्हाड यांनी केले. तसेच खासदार संभाजीराजे भोसले, कॉंग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनीही आक्षेप घेत भाजपने शिवरायांचा अपमान केला आहे, असे म्हटले आहे.
हेच ते जयभगवान गोयल…
शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ असे महान पुस्तक लिहून भाजप कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल.
यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!, असे ट्वीट करत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?, असा सवालही त्यांनी केला.