कामगार राज्यमंत्री भेगडे यांचे आदेश : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये पाहणी
कुरकुंभ – येथील औद्योगिक वसाहतीमधील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमधील बुधवार (दि. 14) झालेल्या भीषण आगीच्या घटनास्थळाची पाहणी करून या घटनेची पूर्ण तपासणी व चौकशी होईपर्यंत कंपनी बंद राहणार आहे. कंपनीवर गुन्हे दाखल करणार आहे, असे पर्यावरण व कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी एमआयडीसी कार्यालयामध्ये स्थानिक ग्रामस्थांशी भेट घेऊन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतील कंपन्यापासून वायू प्रदूषण व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. संबंधित प्रशासकीय अधिकारी कंपनी व्यवस्थापनेला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
भेगडे म्हणाले की, कंपनीपेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. भीषण आगीची सखोल चौकशी करून कंपनी व शासकीय अधिकारी दोषी आढळल्यास संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांना न्याय देण्यात येईल. गरज पडल्यास मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल.
रासायनिक पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतजमिनी मालकांना भरपाई देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना देण्यात येईल. वसाहतीमधील सर्व कंपन्यांची साठवणूक, उत्पादित मालाची व अपघात प्रवण क्षेत्राची माहिती असलेली माहीती पुस्तिका एक महिन्यांत परिसरातील ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे.
प्रदूषण मंडळाचे अधिकारी आठवड्यातील एक दिवस नागरिकांसाठी उपलब्ध राहतील. आमदार राहुल कुल यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, तानाजी दिवेकर, राहुल शितोळे, सनी सोनार, मनोज फडतरे, आयुब शेख, विनोद शितोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.