पुणे-नाशिक रेल्वे साडेतीन वर्षांत ट्रॅकवर येणार
राजगुरुनगर -पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी मोठ्या कंपन्यांनी प्रत्येकी किमान 500 कोटींची गुंतवणूक करावी. यासाठी आपण केलेल्या शिष्टाईला यश येत असून महारेलचे कार्यकारी संचालक राजेशकुमार जैस्वाल यांची संबंधित गुंतवणूकदार कंपन्यांशी प्राथमिक चर्चाही झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी यापुढेही मी प्रयत्नशील राहणार असून, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आगामी साडेतीन वर्षांत ट्रॅकवर येईल, असा आत्मविश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार सुरेश गोरे व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यासमवेत महारेलचे कार्यकारी संचालक राजेशकुमार जैस्वाल यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत जैस्वाल यांनी माझ्या माध्यमातून सुचविलेल्या संभाव्य गुंतवणूकदार कंपन्यांशी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वेसाठी गेली 15 वर्षे मी सातत्याने संघर्ष केला आहे. या प्रकल्पाचा सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यातील खाचाखोचा, अडचणी यांची पूर्ण कल्पना मला आहे. तसेच या भागातल्या विकासासाठी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्यामुळे या प्रकल्पसाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार असून केंद्र सरकार, राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा देशातला पहिला हायस्पिड प्रकल्प असून पुणे ते नाशिक हे अंतर केवळ दोन तासांत कापले जाणार आहे, असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर चाकण एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांची बैठक राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत घेऊन निधीचा प्रश्न सोडविणार असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन्ही आमदार आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे आश्वासन आमदार सुरेश गोरे व आमदार शरद सोनावणे यांनी महारेलचे कार्यकारी संचालक राजेशकुमार जैस्वाल यांना दिले.
अंदाजे नऊ हजार कोटी खर्च
या प्रकल्पात एमआयडीसीने स्वतः किमान 500 कोटींची गुंतवणूक करावी, यासाठी आपल्या सहकार्याने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच गुंतवणूकदार कंपन्याची लवकरच बैठक बोलावून निधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्यात येतील, अशी माहिती जैस्वाल यांनी दिली. किमान तीन कंपन्यांनी 500 कोटी गुंतवणूक केल्यास त्यांचे 1500 कोटी आणि राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय यांचे प्रत्येकी 1500 कोटी असे 4500 कोटी आणि वित्तसंस्थांकडून 4500 कोटी कर्ज घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले असल्याची माहिती माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिली.