शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट
मुंबई : अवकाळी पावसाने राज्यात हाहाकार उडवला असतानाच शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट उभे राहिले आहे. कारण या काळात जे पिकांचे नुकसान झाले त्या पिकांना पीक विमा कसा मिळणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे राज्यातल्या प्रमुख 10 जिल्ह्यातील पीक विमा घेण्यासाठी कोणतीही कंपनी तयार होत नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरचे धान असो की सिंधुदुर्गचे भात, बीडचा कापूस असो की सोयाबीन, परतीच्या पावसाने ही सर्व पीके मातीमोल झाली आहेत. मराठवाड्यात तर पावसाळ्याच्या तोंडावर मोठा दुष्काळ पडला होता. याही संकटात शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसाने तेही पाण्यात घालविले. यामुळे दुबार पेरणी करुनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यातच आता हक्काचा पीक विमासुद्धा या शेतकऱ्यांना भरता येणार नाही.
राज्यामध्ये एकूण 6 क्लस्टरमध्ये वेगवेगळ्या कंपनीमार्फत पीक विम्याचे काम केले जाते. सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशिम, भंडारा, बीड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी एक क्लस्टर बनवण्यात आले आहे. या क्लस्टरसाठी सुरुवातीला 9 सप्टेंबरला निविदा मागवण्यात आल्या पण कोणतीही कंपनी पुढे आली नाही. त्यानंतर 3 ऑक्टोबरला फेरनिविदा मागवण्यात आल्या. तेव्हाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही कंपनी या क्लस्टरचा विमा घेण्यासाठी पुढे आलेली नाही
विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या याच 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा फायदा झालेला आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी पावसाची अवकृपा यामुळे शेतकरी नेहमीच संकटात असतो. अशावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा आधार असतो. अशा परिस्थितीमध्ये जर पीक विमा उतरवण्यासाठी कोणतीही कंपनी समोर येत नसेल तर सरकारने आपल्या कंपन्यांमार्फत पीक विमा उतरवावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.