-वंदना बर्वे
फेसबुक आणि व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियावर आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी बिहारमध्ये कंपन्यांना हायर केले जात आहे. जेडीयू आणि भाजपने राज्यातील मोठमोठ्या हॉटेलांतील खोल्या आरक्षित केल्या आहेत. सोशल मीडिया टीमला याच खोल्यांमध्ये थांबविले जाणार आहे. येथूनच सगळा कारभार चालणार आहे. खोल्यांचा खर्च लाखोत आणि व्हर्च्युअल रॅलीचा खर्च कोटीच्या घरात.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहार विधानसभेच्या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे. संयुक्त जनता दल आणि भाजपची आघाडी झाली आहे. पासवान यांच्या लोजपाची धुरा चिरंजीव चिराग पासवान यांच्या हातात आहे, तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची मदार तेजस्वी यादव यांच्यावर आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक तीन आठवड्यांवर येऊन ठेपली असतानाच केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (लोजपा) प्रमुख रामविलास पासवान यांचे निधन झाले. मागील काही काळापासून ते आजारी होते. याच कारणामुळे चिरंजीव चिराग पासवान यांच्या हातात पक्षाची धुरा देण्यात आली होती. रामविलास पासवान बिहारचे मोठे नेते होते. मात्र, मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. 243 सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक आता तिरंगी होणार आहे. संयुक्त जनता दल, भाजप आणि जीतनराम मांझी यांचा हम असे तीन पक्ष मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव विरोधी पक्षांच्या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. राजद, कॉंग्रेस, सीपीआई, सीपीएम आणि विकासशील इंसान पार्टी एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. राजद 144 जागा लढविणार आहे, तर कॉंग्रेस 70 जागांवर उमेदवार उतरविणार आहे. याशिवाय वाल्मिकीनगरातून लोकसभेची पोटनिवडणूक कॉंग्रेस लढविणार आहे, तर रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनविले जावे, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली होती. जेडीयूने ही बाब सपशेल नाकारली.
विधानसभेची सदस्य संख्या 243 असून निवडणूक 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेबरपर्यंत तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी 71 जागांसाठी मतदान होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी 94 जागांसाठी आणि 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांसाठी मतदान केले जाईल. 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणे आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, पासवान यांच्या निधनामुळे राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि याचा फायदा लोजपाला होईल, असं काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. असं झालं तर, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
चिराग पासवान आपल्या वडिलांचा वारसा प्रभावीपणे चालवू शकतील काय, हाही एक प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, चिराग पासवान यांची सध्याची ओळख रामविलास पासवान यांचे चिरंजीव एवढीच आहे. या पलीकडे त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व तयार झालेले नाही. यात किंचितही दुमत नाही की, रामविलास पासवान बिहारचे एक मोठे नेते होते. केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि ते मोठे होत गेले, व्होटबॅंक मजबूत होत गेली. शेवटी, 2000 मध्ये रामविलास पासवान यांनी संयुक्त जनता दलाला रामराम ठोकत लोक जनशक्ती नावाचा आपला स्वतंत्र पक्ष काढला. यानंतरही त्यांनी आक्रमक रूप धारण केले नाही.
अशात, चिराग पासवान ही निवडणूक स्वबळावर लढविणार आहेत. रामविलास पासवान यांनी आधीच बिहारमध्ये रालोआसोबत न जाण्याची घोषणा केली होती. यानुसार लोजपा कामाला लागली आहे. चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर शरसंधान साधले आहे. अलीकडेच चिराग पासवान यांनी भाजपाध्यक्ष नड्डा यांना पत्र लिहून नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला होता.
नितीशकुमार यांनी 2005 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या साम्राज्याला भगदाड पाडत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची साध्य केली होती. लालूप्रसाद यादव यांची 1990 पासून 15 वर्षांपर्यंत सत्ता होती. यानंतर नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांचा प्रभाव कमी करण्यासाठी महादलित योजनेचा शुभारंभ केला. दलितांमध्येही जे सर्वात जास्त दलित आहेत ते महादलित असं सांगण्यात आले. यात आधी 18 जातींचा समावेश करण्यात आला होता. सध्या यात 23 जातींचा समावेश आहे.
यात सर्वाधिक संख्या रविदास समाजाची आहे. यानंतर दुसाध समाज येतो. सरासरी काढली तर दोघांची संख्या 50-50 लाख आहे. ही व्होटबॅंक नितीशकुमार यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 2010 च्या निवडणुकीत या मतदारांनी जेडीयूला सोबत दिली; परंतु, 2015 मध्ये यात यश आलं नाही. यावेळी लालूप्रसाद यादव यांच्याशी आघाडी केली नसती तर नितीशकुमार मुख्यमंत्री होऊ शकले नसते, असं विश्लेषकांचे मत आहे. चिराग पासवान यांच्यापुढे अनेक समस्या आहेत; परंतु संधीसुद्धा खूप आहेत. फक्त उंचावर बसून पक्षाचा कारभार हाकण्याचं टाळलं तर यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. मात्र, वडिलांचा वारसा मुलांना चालविता आलेला नाही, हाही बिहारचा इतिहास आहे.
बिहारचा पुढचा शिलेदार कोण होणार, हा प्रश्न सध्या सर्वांच्या तोंडावर आहे. बिहारच्या निवडणुकीत पैसा भरपूर ओतला जातो. यासाठीच ही निवडणूक कुप्रख्यात आहे. यावेळेस तर पैशांचा महापूर वाहताना दिसेल असे अनेकांना वाटते. कारण, करोनाच्या भीतीमुळे मोठमोठ्या सभा घेणे शक्य नाही. अशात, सगळं काही व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. यासाठी एलईडी स्क्रीन खरेदी केली जात आहे. त्यांना एका जागेहून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. विजेचा पुरवठा करण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केली जात आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चोरी होऊ नये म्हणून पहारेकरी नेमले जात आहेत.