शब्द, अर्थपूर्ण- भावपूर्ण बोलणं; एकमेकांना समजून घेत बोलणं किती महत्त्वाचं असतं ना! प्रेमात असलेल्या तरुण-तरुणी गुलगुलू तासन्तास बोलताना दिसतात. पूर्वी हेवा वाटायचा त्यांचा. काही वर्षांनी त्यातल्याच काहींचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या! आश्चर्य, खेद, वाईट वाटणं… सगळं व्हायचं. खूप वर्षे या प्रेम आणि नातेसंबंधांचा अभ्यास करतीये. अनेकांशी बोलत असते- खरं तर सोप्पं असू शकतं ना नाते! जे “ना’ही “ते’ दिसते; आणि त्यावरच अडखळते आणि मग कोलमडते ना ते! आपणच अवघड करून ठेवतो ना सगळं! सर्वात महत्त्वाचं काय असतं सांगू? संवाद! प्रेमात पडलं की खूप बोलतात. नंतर विषयही संपतात…अगदी सुरुवातीला एकमेकांची ओळख होते. ओढ वाटते.
काही दिवस मजेत जातात; पुढे गृहित धरायला सुरुवात होते. अपेक्षांचे डोंगर, राग- रुसव्याची रोपटी मुळे धरतात, भावनांची वादळे नि शब्दांची पानगळ. प्रेमाचे आटलेले झरे नि गैरसमजुतीचे किनारे असा “लग्न’ नावाच्या बोटीतला हा दिशाहीन प्रवास अनिश्चितता, भीती, चिंता, दोषारोप वगैरे वगैरेतून होत राहतो; पण प्रेमात टिकून राहण्यासाठी शरीर- मन दोन्हीचा संवाद महत्त्वाचा असतो ना? आता तो ओढून ताणून असला तर टिकणे अशक्यच! एकतर्फी असेल तर त्याला संवाद कसं म्हणणार? त्यासाठी आदर, प्रेम, विश्वास आणि समंजस सहवास किती गरजेचा! दोघांमध्ये काही ना काही विषय, आवड एक असेल तर संवादात मजा येते. विचारदृष्टी, स्वभावातल्या भिन्नतेतही गंमत घेत एकतानता आणणं; अहंकार बाजूला ठेवत सहजसंवादी होणं आणि एकमेकांसाठी वेळ देण्यात मनापासून खुशी होणं; मनाची संकुचित परिमाणे फेकून नात्यात मोकळीक असणं; असं किती किती सहज करता येईल ना? तर खऱ्या अर्थी नातं फुलेल सुद्धा! कधी ना कधी शरीराची ओढ संपते; पण सहवास-मन-भावना-विचारांची देवाण घेवाण याची ओढ नाही संपत! म्हणून कोणत्याही नात्यात संवाद हवाच आणि पती-पत्नीच्या नात्यात तर मूक संवाद; अबोल संवाद, नजर-संवाद सुद्धा महत्त्वाचा! संवाद अधिक सुसंवादित होतो तो अशा अर्थपूर्ण नात्यातून हो ना?
बंध-अनुबंध
माधुरी कौलगुड