बहुजन समाज पक्षाकडून आरोप
विश्रांतवाडी – भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त प्रमाणात जातीयवाद वाढला असून मागासवर्गीयांची मोठ्या प्रमाणात छळवणूक होत आहे. ऍट्रॉसिटी कायद्याद्वारे देण्यात आलेले संरक्षण देखील मिळत नाही. भाजपप्रणित केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी योग्य ती दखल घेऊन बीड तसेच बिलोली घटनांच्या चौकशीचे आदेश देऊन योग्य ती कारवाई करावी. अन्यथा बसपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे बहुजन समाज पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मुकबधिर मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तसेच, बीड जिल्ह्यातील जवळा येथील मातंग समाजातील तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
या घटनांबाबत आंदोलनाच्या इशाऱ्याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, भाऊ शिंदे आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.