रांजणगाव गणपती – जे लोकसभेत निवडून गेले त्यांना कोणाला फोन लागत नाही, मी मात्र जनतेच्या कामांसाठी इथेच उपलब्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोनेसांगवी (ता. शिरुर) येथे केले. येथे नवनिर्वाचित सरपंच रेखा मल्हारी काळे व ग्रामपंचायत सदस्य योगेश टाकळकर, प्रमिला काळे, पुजा म्हस्के यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.
आढळराव पाटील म्हणाले की, लांडेवाडी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली त्याचं कौतुक नव्हतं, परंतु सोनेसांगवी ग्रामपंचायत चा विजय हा खरच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपण सरकारची नोकरी करतोय याचे भान ठेवले पाहिजे. तसेच यापुढे सर्व सामान्यांना त्रास दिला तर वरिष्ठांना पत्र व्यवहार करुन थेट बदली केली जाईल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
१५ वर्ष खासदार राहिलो पण कधीही एमआयडीसी मधील कोणत्याही कंपनीत गेलो नाही. आणि जाणार ही नाही. कारण मी गावांच्या विकासासाठी बांधील आहे. सोनेसांगवी गावासाठी सहा महिन्यातून एक दिवस देण्यात येईल व गावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असेही ते म्हणाले. आदर्श संसद योजनेत करंदी गाव घेतले व १५ कोटी खर्च केले, खासदार निधीतून मंदिरही बांधले. भले त्या गावाने मला १००० मताने पिछाडी दिली, तरी मी आरोग्य केंद्र मंजूर करून दिले. त्याचप्रमाणे सोनेसांगवी गावाकडे “आदर्श गाव” करण्यासाठी विशेष लक्ष राहणार आहे. निवडणुक प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना त्रास देणाऱ्या सोनटक्के या अधिका-यांचा दोन टक्के केल्या शिवाय राहणार नाही, असे आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणात नमुद केले.
या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, देविदास दरेकर, अरूण गिरे, रविंद्र करंजखेले, रामभाऊ देवकर, अनिल नवले, मल्हारी काळे, माजी उपसरपंच सुनिल शेळके, रवी काळे, फक्कडराव टाकळकर, गंगाराम डांगे, रामदास काळे, समीर शेळके, सुरेखा डांगे, ज्योती शेळके, बाबुराव डांगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रेमराज डांगे यांनी तर आभार शंकरराव शेळके यांनी केले.