मुंबई – स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामांचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले.
अनेक क्रांतिकारी चळवळी तसेच आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे. आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.
संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे. त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरे आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली आहे. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो. त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
मराठी टक्का कमी करू नका – शरद पवार
बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते. अनेक जाती-धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकसंधपणे येथे राहत आहेत. अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सांगितले.