गौरी-गणपतीचे साधेपणाने विसर्जन
पुणे – गौरी आणि गणपतींना भाविकांनी गुरुवारी भक्तिभावाने निरोप दिला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने विसर्जन केले. सध्याचे करोना संकट दूर होऊ देत, पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने बाप्पाचे, गौरींचे स्वागत करण्याचा संकल्पही भाविकांनी केला.
सोन्या-मोत्याच्या पावलांनी गौराई घरी आली…असे म्हणत मंळवारी अतिशय उत्साहाने गौरींचे स्वागत करण्यात आले. बुधवारी गौरींचा मनोभावे पाहुणचार करून, गुरुवारी त्यांना आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी गणेशोत्सव आणि गौरीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. याप्रसंगी शेजारी, नातेवाईक यांना दर्शनासाठी बोलावले जाते.
तसेच, महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात. अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात गौरी-गणपतींचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. शक्य तितक्या कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. घरोघरी परंपरेनुसार गौरींचे विसर्जन करण्यात आले.