कोल्हापूर – महापालिकेचा घरफाळा, पाणीपटटी, नगररचना, इस्टेट, परवाना, अग्निशमन विभागांच्या करांची वसुली वाढवा, अशा सुचना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी वसूली विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची असलेने नागरिकांनीही आपली जबाबदारी समजुन त्यांच्या कडील देय असणारी देयके तात्काळ भरावेत असे आवाहन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
महापालिकेच्या विविध विभागांचा वसुलीबाबत आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त कार्यालय येथे आयोजित केली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखील मोरे, सहा.आयुक्त विनायक औंधकर, सहा.संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता भास्कर कुंभार, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, अग्निशमन अधिकारी रणजीत चिले आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थीती अडचणीची असल्याने सर्व विभाग प्रमुखांनी मागणी व थकबाकी वसुलीची प्रभावी अंमलबजावणी करणेची कार्यवाही सुरु करावी. मार्च 2021 अखेर वसुलीचे नियोजन आत्ताच करण्यात यावे. येथून पुढे दर आठवडयास वसुली बाबतच्या आढावा घेण्यात येईल.
पाणी पुरवठा विभागाने वसूलीच्या नोटीशीची मुदत संपलेल्या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी विलंब न करता वसूल करण्याच्या सुचना आयुक्त यांनी जल अभियंता बी एम कुंभार यांना दिल्या. ज्या ग्राहकांकडून वसुली करणे शक्य आहे त्यांचेकडून प्रथम टप्प्यामध्ये वसुली करावी व ज्यांच्याकडून वसुली करण्यांमध्ये अडचणी येत आहेत त्यांचेकडून दुस-या टप्प्यामध्ये वसुली करावी अशा सुचना जल अभियंता यांना दिल्या.
ज्यांची मोठी थकबाकी असलेल्या घरफाळयाची रक्कम भरली आहे त्यांना सन्मान पत्र देण्याची योजना सुरु करा. जेणे करुन घरफाळा रक्कम भरणा-यांचा सत्कार व जे घरफाळा भरत नाहीत त्यांचेवर कारवाई अशा पध्दतीने काम केले तर जे प्रामाणिक कर देत आहेत त्यांचेकडून थकबाकीदार प्रेरणा घेऊन थकबाकीची वसुली होण्यास मदत होईल असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.
स्थानिक संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी सन 2015 – 16 पासून बंद करणेत आली असुन त्यापुर्वीच्या कालावधीची चार्टर्ड अकौंटट मार्फत व्यापा-यांच्या लेखी तपासून स्थानिक संस्था कर आकारणी करणेत येत असलेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी बैठकीत नमूद केले. यापुर्वी शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेमध्ये व्यापा-यांनी सहभाग नोंदवला नाही. मार्च पर्यंत कॅम्प लावून स्थानिक संस्था करापोटी रक्कम रुपये 5 कोटी वसुली करण्याचे नियेाजन करणेत आले असलेचे स्थानिक संस्था कर अधिकारी विलास साळोखे यांनी बैठकीत सांगितले.
घरफाळा विभागाचा दर आठवडयास प्रत्येक विभागीय कार्यालयानुसार आढावा बैठक घेत असून त्यांचेकडून मोठया रक्कमेची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना आढावा घेतला जात आहे. यामध्ये थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा केला जात असलेचे सहा आयुक्त विनायक औंधकर यांनी सांगितले. घरफाळा विभागाने आज अखेर रक्कम रुपये 29.73 कोटी वसूली केली आहे.
आज अखेर 26000 मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. रक्कम रुपये 5 लाख व त्यावरील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना नोटीस काढण्याचे नियोजन केले आहे. आज अखेर 15000 मिळकतधारकांनी ऑनलाईन घरफाळा भरला असलेचे कर निर्धारक संजय भोसले यांनी बैठकीत नमूद केले.
पाणीपट्टी वसुलीसाठी 5 पथके गठीत करीत असुन त्यांचेकडून मागणी व थकबाकीची वसुली सुरु करीत आहे तसेच थकबाकीदारांना यापुर्वीच नोटीस बजावणेत आली. शासकीय कार्यालयांनाही थकबाकी वसुलीसाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा विभागास रक्कम रुपये 55 कोटी वसुलीचे उद्दीष्ट देणेत आले असुन तीची वसुली करण्याची प्रभावी कार्यवाही करीत असलेचे जल अभियंता बी एम कुंभार यांनी सांगितले.
महापालिकेची आर्थिक परिस्थीती अडचणीची असल्याने महापालिकेच्या सर्व विभागानी वसूली वाढविण्याच्या दृटीने नियोजन करुन अधिकाधीक वसूली करावी, याकामामध्ये हायगय करु नये, अशी सुचनाही आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केली.