मुंबई – भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री,मॉडेल उर्फी जावेद यांच्यात सुरु असलेला वादाचा कलगी तुरा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनबाबत तिला सुनावल्यानंतर उर्फीने वाघ यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी वकील नितीन सातपुते यांनी राज्य महिला आयोगाकडे थेट तक्रार केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील भाष्य केले आहे.
उर्फी जावेद यांनी त्यांना मिळालेल्या धमक्यांबाबत माहिती दिली असून त्यांना असुरक्षित वाटत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत त्यांच्याकडून लेखी तक्रार आल्यावर त्याच्यावर पुढील कारवाई करू असं रुपाली चाकणकर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या. तसेच वकील नितीन सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीच्या प्रतीमध्ये आयोगाने सहकार्य करावे असे म्हंटले आहे त्यामुळे आमच्या विधिसेवा आणि सदस्यांसोबत बोलून त्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही चाकणकर यावेळी म्हणाल्या.
उर्फी प्रकरणामध्ये आपण कोणाच्या बापालाही घाबरत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली होती. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या,”आयोगाची गरिमा मोठी आहे. आयोगाकडे फार काम आहेत महाराष्ट्राचे फार मोठे प्रश्न देखील आयोगासमोर आहेत. रोज महाराषट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांची कामे करण्याचं काम आयोग करत त्यामुळे कोण काय म्हणतय किंवा कोण काय बोलतंय यावर बोलण्यास आयोगाला वेळ नाही.” असं स्पष्ट मत यावेळी चाकणकर यांनी व्यक्त केलं.