पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि गायक बाबूल सुप्रियो यांनी सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटांवर विजय मिळवला. त्या दोघांच्या विजयाने सेलिब्रिटी राजकीय पक्षांसाठी बूस्टर ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
चित्रपटसृष्टीतील कलाकार, माजी क्रिकेटपटू यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी राजकीय क्षेत्रात योगदान दिले आणि आजही देत आहेत. काही सेलिब्रिटी स्वेच्छेने राजकारणात सक्रिय झाले, तर काही राजकीय पक्षांच्या आग्रहास्तव.
काही सेलिब्रिटींनी प्रदीर्घ राजकीय खेळी केली, तर काहींचा भ्रमनिरास झाला. मात्र, राजकीय पक्षांना त्यांचा लाभच झालेला दिसतो. आसनसोलची पोटनिवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण. लोकसभेची ती अवघड जागा जिंकणे तृणमूलला सिन्हा यांच्यामुळे शक्य झाल्याचे मानले जात आहे. अवघड वाटणाऱ्या अनेक लढती सेलिब्रिटींना रिंगणात उतरवून विविध पक्षांनी जिंकल्याची आजवर अनेक उदाहरणे आहेत. सेलिब्रिटींची लोकप्रियता कॅश करून बाजी मारण्याचा फंडा राजकीय पक्षांनी अवलंबलेला दिसतो. त्या पक्षांमध्ये भाजप, कॉंग्रेस आणि तृणमूलचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल. संबंधित सेलिब्रिटी राजकीय पक्षांना निवडणुकांवेळी स्टार प्रचारक म्हणूनही उपयोगी पडतात.
राजकारणात खरोखरीच रस असणाऱ्या कलाकार, खेळाडूंनी त्या क्षेत्रात आणि पक्षकार्यात भरीव योगदान दिल्याचेही दिसते. तशा सेलिब्रिटींमध्ये सुनील दत्त, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा या ज्येष्ठ अभिनेत्यांचा समावेश आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदेही भुषवली. आजही अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडू खासदार किंवा आमदार म्हणून सक्रिय आहेत. त्यामध्ये जया बच्चन, हेमा मालिनी, स्मृती इराणी यांचा उल्लेख करावा लागेल. अभिनेता सनी देओल, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या लोकसभेचे खासदार आहेत. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याला अलीकडेच आम आदमी पक्षाने राज्यसभेवर पाठवले आहे. राजकारणात अनेक सेलिब्रिटी यशस्वी ठरले. मात्र, ते क्षेत्र न मानवलेलीही खूप उदाहरणे आहेत. त्यातील प्रमुख नाव म्हणजे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन. बच्चन यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आग्रहावरून राजकारणात प्रवेश केला. लोकसभा निवडणूक जिंकून ते खासदारही बनले. मात्र, बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्याने व्यथित होऊन बच्चन यांनी खासदारकी आणि राजकारण सोडले.
बॉलीवूडचे पहिले सुपस्टार राजेश खन्ना हेही एकवेळ खासदार बनले, पण त्यांचे मन राजकारणात रमले नाही. कारकीर्द भरात असताना अभिनेते गोविंदा हेही निवडणूक लढवून खासदार बनले. मात्र, त्यांच्याही पचनी राजकारण पडले नाही. सेलिब्रिटींच्या राजकारणात येण्याने जनतेला लाभ होतो का, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक सेलिब्रिटी राजकाणात केवळ बाहुले ठरले असले तरी काहींनी चांगले कार्यही करून दाखवले आहे. अर्थात, निवडणूक जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन राजकीय पक्ष सेरलिब्रिटींचा आधार नेहमीच घेत राहतील. दक्षिणेकडील राज्यांमधील निवडणुकांचे राजकारण तर चित्रपटसृष्टीतील ताऱ्यांशिवाय पूर्णच होताना दिसत नाही. त्यामुळे सेलिब्रिटी आणि राजकारण यांच्यातील नाते यापुढेही अबाधित राहील.