तब्बल 37 हजार कोटींच्या व्यवहारास चालना
नवी दिल्ली : एकीकडे करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशभर लॉकडाऊन असताना, केंद्र सरकारच्या काही अत्यावश्यक सेवा अव्याहत कार्यरत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी. संपूर्णपणे संचारबंदी असतानाही टपाल सेवेने आर्थिक व्यवहार आणि टपाल वितरणात नवे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. या एका महिन्याच्या अवधीत तब्बल 37 हजार कोटींच्या व्यवहारास चालना मिळाली आहे. त्यामध्ये 33 हजार कोटींचे व्यवहार पोस्टल रिकरिंगद्वारे तर 2600 कोटींचे व्यवहार पोस्टल बॅंकींगद्वारा केले आहेत.
भारतीय टपाल खात्याने आपल्या लॉकडाऊनमधील कार्यक्षमतेविषयीची एक पोस्ट आपल्या अधिकृत फेसबुक पानावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार “आधार’ कार्डशी संबंधित 23 लाख व्यवहारांतून किमान 452 कोटी रुपयांची उलाढाल झाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अर्थात डीबीटी व्यवहारांमध्येही टपाल खात्याने 74.6 लाख व्यवहारांतून 700 कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होण्यास मदत झाली आहे.
किमान 2.3 कोटी पोस्टल बचत सेवेद्वारे (रिकरिंग) 33 हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तर एक कोटी आयपीपीबी व्यवहारांतून 2600 कोटी रुपयांची उलाढाल झाली. तसेच 31.5 लाख मनी ऑर्डर्सच्या माध्यमातून 355 कोटी रुपये घराघरांत पोहोचवले. याशिवाय या कालावधीत खासगी कुरिअर बंद असताना टपाल खात्याने 42.5 लाख पत्रे देशाच्या कानाकोपयात पोहोचवली आहेत.