मुंबई : राज्यातील करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे, मात्र तिसऱ्या लाटेचे सावट कायम असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही दिवसागणिक भर पडताना दिसत आहे. मात्र या सर्वात एक दिलासा देणारी बातमी म्हणजे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
राज्यात दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही संमिश्रपणे आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ४२४ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार ४०८ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, ११६ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील आज नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०१,१६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.८७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या ६४,०१,२१३ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३५२५५ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१२,९१,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०१,२१३ (१२.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६१,३०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.