मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. मागील दोन दिवसात राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु या कठीण परिस्थितीमध्येही दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हर म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या 27 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट आहे. ही टक्केवारी राज्य सरकारने 10 जून रोजी जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारावर काढली आहे.
रायगड, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
राज्यात गुरुवारी 3607 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.