जळगाव – महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील आठवडाभराचा विचार करता करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक घट होत असल्यामुळे आणि बाधित होणाऱ्या एवढेच रुग्ण बरे होऊन परत जात असल्यामुळे प्रशासन आणि जनतेच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
करोनाच्या बाबतीत सुरुवातीपासून जळगाव जिल्हा हा हॉटस्पॉट ठरला आहे. पहिल्या लाटेत तर मृत्यूदर हा तेरा टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचला असल्याने केवळ देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगाव चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न करून मृत्यूदर कमी करण्यात यश मिळविल्यामुळे प्रशासन आणि जनतेत काहीशी बेफिकिरी आल्याचे समोर आले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या लाटेचे रूपांतर केव्हा समूह संसर्गात झाले हे कोणालाही कळले नव्हते.
जळगाव जिल्ह्याचा सध्या विचार केला तर कोरोनाची दुसरी लाट ही उच्च पातळीवर असल्याचे पाहायला मिळत असल्याने आणि रोज साधारणपणे बाराशे नवे रुग्ण आणि पंधरा बधितांचा मृत्यू असे समीकरण बनल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत होते. पण, जर गेल्या आठवड्याचा विचार केला तर दिवसागणिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असल्याचे समोर आल्याने जळगावकरांच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी आहे.