नवी दिल्ली -उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये करोनाचा उच्चांक येऊन गेला. आता संसर्गाचा कल उताराकडे आहे. संसर्ग होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये करोनाचा उच्चांक यायला अद्याप वेळ आहे. त्याकरीता सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सध्या सर्वाधिक धोका बिहार, केरळ, झारखंड, राजस्थान, हरियाणा, तेलंगणामध्ये आहे. सध्या येथे संसर्गाचे प्रमाण कमी अधिक होते आहे. आयआयटीचे प्रो. महेंद्र कुमार वर्मा यांनी करोनाच्या प्रतिदिवस संसर्गाच्या आधारावर एक मॉडेल तयार केले आहे.
याआधारावर करोना संसर्ग वाढणे किंवा कमी होण्याचे आकलन केले जाते. वर्मा यांनी प्रत्येक राज्यासाठी वेगळा रिपोर्ट तयार केला आहे.
प्रो. वर्मा यांनी अपल्या रिपोर्टमध्ये टीपीआर आणि सीएफआरचे देखील आकलन केले आहे. त्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे हा रिपोर्ट पाठवला आहे. त्यात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.