नवी दिल्ली -कॉंग्रेसमधील व्यापक फेरबदलांकडे काळजीपूर्वक केलेले बॅलन्सिंग ऍक्ट म्हणून पाहिले जात आहे. त्या फेरबदलांच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत नाराजीचा सूर आळवणाऱ्या काही ज्येष्ठ नेत्यांचे महत्व कमी करण्यात आले आहे. तर, काहींवरील विश्वास कायम असल्याचे सूचित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शिद आणि तारिक अन्वर या नेत्यांचे कमबॅक झाले आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या दिग्विजय यांना 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले होते. मात्र, आता त्यांना कायम निमंत्रित म्हणून कार्यकारिणीत पुन्हा स्थान मिळाले आहे. गांधी परिवाराचे निष्ठावान असणाऱ्या खुर्शिद यांना मागील काही काळापासून पक्षाची महत्वाची जबाबदारी मिळाली नव्हती. तेही कार्यकारिणीत दिसणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेवेळी अन्वर त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत गेले. ते 2018 मध्ये कॉंग्रेसमध्ये परतले. त्यांनाही पक्षाने महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षाच्या स्थितीबाबत नाराजीचा सूर आळवणाऱ्या 23 ज्येष्ठ नेत्यांना पक्षांतर्गत शह म्हणून दिग्विजय, खुर्शिद आणि अन्वर यांच्या कमबॅककडे पाहिले जात आहे.
कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवले. त्यामध्ये पक्षात व्यापक सुधारणांची आणि पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली. त्या पत्राला लेटर बॉम्बचे स्वरूप आले. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचे आणि पक्षात नेतृत्वाचा पेच निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले. त्यापार्श्वभूमीवर, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना सरचिटणीसपदावरून हटवून लेटर बॉम्ब फोडणाऱ्यांना एकप्रकारे इशारा देण्यात आला.
अर्थात, पत्र पाठवणाऱ्यांमध्ये समावेश असणाऱ्या आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि जितीन प्रसाद यांच्यासह आझाद यांचे कार्यकारिणीतील स्थान अबाधित ठेऊन समतोलही साधण्यात आला.