कोपरगाव – कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पाणीप्रश्न पाच नंबर साठवण तलाव झाल्याशिवाय सुटू शकत नाही. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी साठवण तलावाचा मुद्दा सातत्याने उचलून धरला आहे. या साठवण तलावाचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आ. काळे यांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे.
कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने नागरिकांना 2016 च्या उन्हाळ्यात तब्बल 23 दिवसांनी व मागील उन्हाळ्यात 15 दिवसांनी पाणीपुरवठा केला.
या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू करावे, यासाठी आ. काळे यांनी मागील पाच वर्षांत उपोषण, धरणे आंदोलन व न्यायालयात जाऊन या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. नागरिकांना सातत्याने भेडसावत असणाऱ्या पाणी टंचाईवर नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू होणे, हा एकमेव पर्याय आहे. यापूर्वी कोपरगाव शहरासाठी पवार यांनी 42 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिलेली आहे.
कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न पवार यांच्या माध्यमातूनच सुटू शकतो, असा विश्वास असल्यामुळे आ. काळे यांनी पवार यांना कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालावे, असे साकडे घातले आहे. नागपूर येथे पवार आले असता आ. काळे यांनी त्यांची भेट घेत शहराच्या पाणीप्रश्नाविषयी असलेल्या अडचणी सांगून, पाच नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु व्हावे, या मागणीचे निवेदन दिले.