जळगाव – राज्य सरकार करोनासारख्या महामारीशी लढा देत असताना विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत. विरोधकांकडून सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. पण हे सरकार स्थिर आहे. करोनाचं संकट गेल्यावर मैदानात या, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिले आहे.
गुलाबराव पाटील आज (27 मे) दुपारी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आले होते. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून ते आपला कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
करोनाच्या काळात कोण काय करत आहे? हे जनता जाणून आहे. करोनाचं संकट येण्यापूर्वी मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण केले गेले, त्याचपद्धतीने महाराष्ट्रात वातावरण निर्मिती सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला जनतेने स्वीकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेच्या मनात पक्के बसलेले आहेत. त्यामुळे सरकार पाडण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न आहे. करोनासारख्या संकटात विरोधकांनी हा घाण प्रयत्न केला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.