सातारा – मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पहिल्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावळी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली.
मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, महामार्गावर मुख्य आणि सेवा रस्त्यांची दुरुस्ती करावी, रहिमतपूर- मेढा ते महाबळेश्वर आणि सातारा ते कास या मुख्य पर्यटनस्थळांच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि परळी ते सज्जनगड रोप वे मंजूर करुन काम सुरु करावे, आदी प्रश्नांकडे शिवेंद्रराजे यांनी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे लक्ष वेधून घेतले. हे सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही ना. पाटील यांनी बैठकीत दिली.
पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मागणीवरुनच जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली होती.
तसेच यासाठीची पदनिश्चिती आणि पदनिर्मीतीही मंजूर करण्यात आली होती. मेडिकल कॉलेजसाठीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु करुन प्रत्यक्षात मेडिकल कॉलेज सुरु करावे आणि जिल्ह्यातील तरुणांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करावीत, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली. यासंदर्भात आरोग्य मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने निर्णय घेऊ, असे ना. पाटील यांनी सांगितले.
महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आक्रमक आंदोलन केले होते. आंदोलनानंतर महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दुरुस्तीस प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाने महामार्गासह सर्व ठिकाणच्या सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली. याबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल, असे ना. पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सिंह यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
रहिमतपूरहून मेढा मार्गे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याचे आणि सातारा ते कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. राज्याच्या बांधकाम सचिवांसोबत बैठक घेऊन दोन्ही रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचा शब्द ना. पाटील यांनी दिला. सज्जनगडावर जाण्यासाठी परळी येथून रोप वे चे काम लवकर पूर्ण करावे, या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देवून ना. पाटील यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.