सातारा -मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर दाखल गुन्ह्यात सरकार पक्षाचे काम पाहणारे सहाय्यक सरकारी वकील मिलींद ओक यांनी या खटल्यातून माघार घेतली आहे. या खटल्यात यापुढे काम करण्याची इच्छा नसल्याचे पत्र ओक यांनी सरकारी वकीलांना लिहले आहे. याखटल्याची सुनावणी सध्या जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.सालकुटे यांच्यापुढे सुरू आहे. याबाबत माहिती अशी, मायणी येथील भिसे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून,
त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर वडूज येथील सत्र न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यावर आ.गोरेंच्यावतीने उच्च न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना आ. गोरे यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा नियमीत जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानंतर आ. जयकुमार गोरे हे स्वत:हून जिल्हा व सत्र न्यायालयात दि. 6 रोजी शरण आले होते. यावेळी जामीनासाठी आ.गोरे यांच्यावतीने तगड्या वकीलांची फौज तैनात करण्यात आली होती. तर सरकार पक्षाकडून अनुभवी असलेले वकील मिलींद ओक यांच्यासह मुळ तक्रारदाराकडून जेष्ठ विधीज्ञ शरदचंद्र भोसले यांनी युक्तीवाद केला होता. सुनावणी झाल्यानंतर न्यायासधीस सालकुटे यांनी आ.गोरेंना दिलासा देत तात्पुरता जामीन दिला होता. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि.11 रोजी होणार होती. मात्र,तत्पूर्वीच खटल्याचे काम पाहणारे सरकारी वकीलांनी माघार घेतल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.