शेवगाव – बोगस नावावर खोटे फेसबुक अकाउंट काढून पंकजाताई व मोनिकाताईंचे बिनसले आहे. त्या येथे येणार नाहीत असा मेसेज काहीजण फैलावत आहेत. खोट बोल पण रेटून बोल ही त्यांची नीती आहे.
परळीला पंतप्रधान मोदी येत असल्याने त्यांच्या सभेचे नियोजन करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक सभा तहकूब केल्या आहेत. त्या येथे येणारच आहेत त्यांचे संबंध आजचे नाहीत, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सुरेश धस यांनी केले. सुमारे तासभर धस यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.
तालुक्यातील बोधेगाव येथे भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत धस बोलत होते. ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ घोरतळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उमेदवार आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, काशिनाथ लवांडे, तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, शेवगाव नगरपरीषदेचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अरुण मुंढे, अभय आव्हाड, नंदु शेळके, अजय भंडारी, अशोक आहुजा, उदय शिंदे, कचरु चोथे, शिवसेनेचे भारत लोहकरे, एकनाथ कुसळकर, डॉ. भिमराव फुंदे, धनंजय बडे, कासम शेख, वाय.डी कोल्हे, गोकुळ दौंड, सुनिल राजपुत, कमलताई खेडकर, आशा गरड, काशिताई गोल्हार आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
धस म्हणाले, 1995 मध्ये सत्ता स्थापनेसाठी स्व. गोपीनाथ मुंडे संकटात असतांना आमदार मोनिकाताईचे वडील अपक्षांचे नेते अशोक पाटील डोणगावकर यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आणि प्रत्येक वेळेस ते मुंडे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणूनच मुंडे साहेब मोनिकाताईंना मुलगी मानत. असे त्यांच्या घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत. पंकजाताईंना कोणी काही सांगितलं आणि ते त्या ऐकतील असे होणे नाही. पंकजाताई येणार नाही हे सब कुछ झूठ आहे. पैशावर राजकारण चालत नाही पाच वर्षाच्या कालावधीत सर्वांना खुश ठेवू शकत नाही हा माझा अनुभव आहे.
येथे नितीनराव दिसले नाहीत ते आमचे आमचेच आहेत. त्यांचे काही गैरसमज झाले असतील तेही काढून टाकू. प्रतापकाकांनी मागे बैठक घेवून भाजपा सोडली. आताही विधानसभेच्या अगोदर बैठक घेवून चिन्ह कोणतेही असू दया, उभच राहायचं असे म्हणायचे. विरोधकांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले. आमच्या सरकारने मराठा आरक्षण दिले. तेही अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता दिले. धनगरज समाजाला 1 हजार कोटीची तरतुद केली.
मोनिका राजळे म्हणाल्या, मी पाच वर्षात मतांच्या पेटीकडे डोळा ठेवून काम केले नाही. तर केंद्र व राज्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. सध्या वैचारिक राजकारण हरवत चालले आहे. विरोधक एकटी महिला समजून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीपातीची अफवा पसरवून हिन राजकारण करत आहेत. सामान्य जनतेवर माझा विश्वास असून तेच मला निवडुन आणतील असा विश्वास व्यक्त करत विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला. यावेळी तुषार वैदय, दिनेश लव्हाट, अरुण मुंढे, काशिनाथ पाटील लवांडे, कचरु चोथे, निलकंठ कराड आदींची भाषणे झाली.