वाई -प्रशासनाकडून झालेली ढिलाई तसेच नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांची झालेली पायमल्ली तसेच मुंबई-पुणे व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळेवाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात करोना रुग्णांची झपाट्याने झालेली वाढ चिंताजनक आहे. वेळीच उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने करोना बाधित गावामध्ये कडक संचारबंदी राबवावी, असे स्पष्ट निर्देश आमदार मकरंद पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना दिले.
यावेळी आ. पाटील म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बेशिस्त नागरिकांवर मास्क न घालणारे, सामाजिक दुरावा न पाळणारे, दुचाकी व चार चाकीवर ठरवून दिलेले मर्यादेपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांवर, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोर जावे लागेल. तसेच वाई, शिरवळ, खंडाळा औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांनी कंटेनमेन्ट झोनमधील असणाऱ्या कामगारांना उपस्थिती विषयी सक्ती करू नये.
वाई नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीतस जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कुबुले, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वाई पंचायत गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, महाबळेश्वर गटविकास अधिकारी श्री. घोलप, खंडाळा गटविकास अधिकारी श्री. बिचुकले, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, पाचगणी-महाबळेश्वर मुख्याधिकारी अमिता दगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, वाई पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे, कृषी सभापती मनोज पवार, वाई पंचायत समितीचे उपसभापती भैय्या डोंगरे, वाई नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनील सावंत, नगरसेवक दीपक ओसवाल, चरण गायकवाड, संग्राम पवार यांच्या उपस्थित होते.