जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे सूचक वक्तव्य
पिंपरी –मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्याला भाजपाने अभिमन्यूसारखे चक्रव्युहामध्ये अडकविले होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेना गाफील राहणार नाही. वेळप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जागा लढवून “एकला चलो रे’ चीही आमची तयारी आहे, असे परखड मत जलसंधारणमंत्री डॉ. प्रा. तानाजी सांवत यांनी व्यक्त करत युतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत दिले. उस्मानाबादमधील सहाही जागा शिवसेना जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भूम परांडा वाशी येथील पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांच्या वतीने रविवारी आकुर्डी येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जलसंधारण मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी भूम परांडा वाशी रहिवासी पिंपरी चिंचवड संघाचे अध्यक्ष युवराज कोकाटे व निमंत्रक चंद्रकांत सरडे, माजी खासदार गजानन बाबर, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद, भूम तालुका शिवसेना प्रमुख सुरेश कांबळे, पुणे मनपा शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, रोमी संधू उपस्थित होते.
…ते असतानाही तुम्हाला गाव सोडावे लागले खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सरकारच्या मदतीची वाट न पाहता भूम, परांडा, वाशी तालुक्यात पाचशे किलोमीटर नाले, नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण स्वखर्चाने केले. 19 वर्षे त्या भागातील पाटबंधारे मंत्री असताना तुम्हाला गाव सोडून येथे यावे लागले ही खेदाची बाब आहे. ते 19 वर्षात साधे 19 टीएमसी पाणी अडवू शकले नाहीत. डॉ. सावंत यांनी मात्र फक्त एक महिना दोन दिवसात 135 बंधाऱ्यांना मंजुरी, 550 बंधाऱ्यांचे जीआर काढून प्रक्रिया सुरू केली आहे.
पाणीप्रश्नावरुन जलसंधारणमंत्री डॉ. प्रा. तानाजी सांवत म्हणाले की, मागील पन्नास साठ वर्षात “जाणता राजा’ने मराठवाड्याचे पाणी पळविले. आता आमच्या हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळविणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक स्वागत युवराज कोकाटे व आभार चंद्रकांत सरडे यांनी मानले. आयोजनात दीपक गटकळ, कैलास कुदळे, सचिन शिंदे, भाऊ हरणावळ, सुजाता गजरमल, पप्पू वायसे, सूर्यकांत देशमुख, रामराजे सावंत यांनी सहभाग घेतला आहे.