कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पेरणी मोठ्या प्रमाणात बाजरी, मका, सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र ही बियाणे उगवलीच नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी शास्त्रज्ञांसह चांदेकसारे, कोकमठाण व परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
येथील शेतकऱ्यांनी महाबीज, ग्रीनगोल्ड आदी कंपन्यांचे बाजरी, मका, सोयाबीन आदी बियाणे शेतात पेरली होती. मात्र ती निकृष्ट दर्जाची असल्याने त्यांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. काळे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आ. काळे यांनी शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व महाबीज व ग्रीनगोल्ड कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. बुधवारी (दि.24) आ. काळे यांनी बियाणे शास्त्रज्ञांना सोबत घेवून उगवण न झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
यावेळी आ. काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तातडीने चर्चा करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी अडचणींचा सामना करीत असून, त्यांना नुकसान भरपाई व तत्काळ उच्च प्रतिची बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना केल्या.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणे शास्त्रज्ञ डॉ. रामसिंग, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, पंचायत समिती कृषी अधिकारी पंडित वाघिरे, कृषी पर्यवेक्षक संजय धनकुटे, कृषी अधिकारी पांडुरंग जाधव, महाबीज फिल्ड ऑफिसर कविता देवढे, कृषी दुकानदार प्रतिनिधी दीपक गव्हाळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, सुधाकर रोहोम, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक सुदाम लोंढे, विजय रक्ताटे, महेश लोंढे, विजय थोरात आदी उपस्थित होते.