सणबूर – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे अनेक विकासकामे व पाणी टंचाईच्या उपाययोजना प्रलंबित राहिल्याने डोंगर पठारावरील गावांना पाणीटंचाई भासत होती. विकासकामांमध्ये कायम तत्पर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी लोकसभेची आचारसंहिता शिथील होताच मतदार संघातील पाणी टंचाईचा आढावा घेवून असणाऱ्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, नायब तहसीलदार लोंढे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, उपअभियंता गरुड, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आरळेकर, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार देसाई यांनी माहे डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या पाणीटंचाई आराखडयातून किती कामे मंजूर झाली व लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे किती कामे प्रलंबित आहेत याची माहिती घेतली. तालुक्यातील डोंगर पठारावरील वाड्यांना टंचाई काळात टॅंकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे. परंतु डोंगर पठारावरील गावामध्ये तसेच वाड्यावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची तसेच नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करुन देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगण्यात आले.
टंचाई आराखड्यातील किती कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीकरीता पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाबाबात गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा उपअभियंता यांनी तात्काळ माहिती देण्याबाबत सूचना केल्या. पाणी टंचाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता प्रस्ताव सादर होताच त्यास मंजूरी देण्याचे आश्वासन दिल्याचे आ. देसाई यांनी सांगितले. पाणी टंचाई मुक्तीकरीता लागणारा निधी कमी पडणार नाही. परंतु अधिकाऱ्यांनी कामात हयगय करु नये, अशा सूचनाही आमदार शंभूराज देसाई यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.