सातारा -म्हसवड येथील प्रस्तावित एमआयडीसी स्थलांतरित करण्याचा शासनाचा कोणताही आदेश नाही. रामराजें नाईक निंबाळकर यांनी ही एमआयडीसी नांदवळ परिसरात व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, आजपर्यंत त्यांचे कोणतेच प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ दिले नाहीत. म्हसवड पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सो कॉल्ड संघर्ष समितीने गेल्या पाच वर्षाच्या कारभाराचे अपयश आणि केलेले पाप झाकण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला आहे. या एमआयडीसीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. हा प्रकल्प म्हसवडमध्येच होण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. संघर्ष समितीने त्याची चिंता करु नये, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.
म्हसवड येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, सुनील पोरे, लुनेश विरकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, “”तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळापासून मी या एमआयडीसीसाठी प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प छोटा होता. नंतर मुंबई बंगळुरू कॉरिडॉरअंतर्गत मोठ्या प्रकल्पासाठी यशस्वी प्रयत्न केले. मात्र, सध्या काही लोक हेतूपुरस्कर चुकीची माहिती देऊन जनतेत गैरसमज निर्माण करत आहेत. म्हसवड एमआयडीसी स्थलांतरित करण्याचा विषय आजपर्यंत शासनाच्या कोणत्याही आदेशात आला नाही. याबाबतच्या चर्चा रंगू लागल्यावर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. हा प्रकल्प स्थलांतरित होणार नाही, त्यासाठी मी आणि खा. रणजित निंबाळकर सक्षम आहोत.
स्थलांतरित होणार नाही देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प कुठेही जाऊ देणार नाहीत.” नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयडीसी स्थलांतराचा विषय मुद्दाम आणि दिशाभूल करण्यासाठी उपस्थित करण्यात आला आहे, से त्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार वर्षात म्हसवडची अवस्था फार वाईट झाली आहे. जनतेला आठ ते दहा दिवसांनंतर खराब पाणी मिळत आहे. सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. स्मशानभूमीची अवस्था दयनीय आहे. राज्यात रोलमॉडेल ठरलेल्या गार्डनला अवकळा आली आहे. गेल्या पाच वर्षात एकही ठोस काम झाले नाही. शहराची दुरवस्था जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पाच वर्षातील अपयश, केलेली पापे झाकण्यासाठीच एमआयडीसी स्थलांतराचा खोटा बागुलबुवा उभा करुन जनतेचे लक्ष विचलीत केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
…संघर्ष समिती रस्त्यावर उतरेल का?
म्हसवडचा औद्योगिक प्रकल्प स्थलांतरित करण्याचा प्रयत्न ज्या फलटणकरांनी केला आहे. त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या बगलबच्चांची संघर्ष समिती रस्त्यावर उतरणार का, असा प्रश्न बैठकीतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. प्रकल्प स्थलांतरित करण्यात येणार असल्याचा एकही कागदोपत्री पुरावा नसताना जनतेची दिशाभूल करणारी बचाव समिती नौटंकी करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.