मुंबई – देशात आणि राज्यात अनेकदा प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन प्लॅस्टिक बाटल्या, पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वेष्टनांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पुढे या, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात शनिवारी पॅकिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या विविध उत्पादन कंपन्यांची शनिवारी बैठक झाली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारने प्लॅस्टिक कॅरिबॅगसह विविध प्रकारच्या सिंगल युज प्लॅस्टिकवर पूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. पण विविध प्रकारची पेये, पाण्याच्या बाटल्यांचा वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱया कचऱयाचा प्रश्न आता आपल्यासमोर असल्याचे सांगत पर्यावरण मंत्र्यांनी संबंधित कंपन्यांनी या कचऱयाच्या व्यवस्थापनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.