पुणे : रक्तदान करणे हे एक मोठे काम असून यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले. पुण्यातील कोंढवा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कोरोना महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. राज्यातील गोरगरिबांना मदत करणे महत्त्वाचे आहे. सर्व रक्तदात्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले. यावेळी लॉकडाऊन कालावधीत ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सन्मानही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार चेतन तुपे म्हणाले, कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हे फार महत्त्वाचे असून यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचू शकतात. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो.