नाशिक – 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाच्या वतीने जवळपास दोन कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. परंतु संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधील विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाबाबतची आढावा बैठक भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
छगन भुजबळ म्हणाले, 16 वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरात 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी ही अभिमानस्पद बाब आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेबरोबरच याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे. त्यामुळे शहरातील विविध संस्थांनी व नागरिकांनी आर्थिक योगदानासाठी पुढे येऊन लोकसहभाग वाढवावा. तसेच शहरातील हॉटेल चालकांनी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची, नास्ता व जेवणाची सोय करावी, असेही त्यांनी सांगितले.
“बालसाहित्य’मेळावा ठरणार आकर्षण
साहित्य संमेलनात सर्वच वयोगटातील लोकांचा सहभाग असणार आहे. या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून 400 स्टॉल्स उभारले जाणार आहे. या व्यतिरिक्त पर्यटन, चित्रकला, शिल्पकला, प्रकाशन कट्टा, कवीकट्टा यासाठी सुद्धा वेगवेगळ्या हॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे. कवीकट्ट्यात आपल्या कविता सादर करण्यसाठी आजपर्यंत 1 हजार 532 कविता प्राप्त झाल्या आहेत. संमेलनात बालगोपाळांसाठी बालसाहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित रहाणार आहे. त्यामुळे संमेलनातील “बालसाहित्य’मेळावा संमेलनाचे आर्कषण ठरणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.