दिगंबर आगवणेंचा सलग दुसऱ्यांदा पराभव, राजेगटाचे वर्चस्व
फलटण – फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार आ. दीपक चव्हाण यांनी विजयाची हॅट् ट्रिक करत आपले नजीकचे प्रतिस्पर्धी, भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांचा 30 हजार 981 मतांनी पराभव केला. आ. चव्हाण यांनी दिगंबर आगवणे यांना दुसऱ्यांदा या मतदारंघात नमवले. आ. चव्हाण यांना मिळालेली मते पाहता येथील मतदार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी (दि. 21) तीन लाख 30 हजार 321 मतदारांपैकी एक लाख 15 हजार 116 पुरुष आणि 98 हजार 712 स्त्रिया, अशा एकूण दोन लाख 13 हजार 828 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. येथील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रात आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम टपाली मते मोजण्यात आली. त्यानंतर 14 टेबलांवर 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. आ. चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर त्यांना एकूण एक लाख 17 हजार 617 तर आगवणे यांना 86 हजार 636 मते मिळाली. या मतदारसंघातील अन्य उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – प्रदीप उर्फ प्रेम सुरेश मोरे (बहुजन समाज पक्ष, 934), अमोल अबाजी पवार (प्रजासत्ताक भारत पक्ष, 342), अरविंद बाबुराव आढाव (वंचित बहुजन आघाडी, 5460), अमोल मधुकर कारंडे (अपक्ष, 216), पांडू समुद्रलाल अहिवळे (अपक्ष, 182), कांचनकन्होजा धोंडिराम खरात (अपक्ष, 780), चंद्रकांत अंबर अहिवळे (अपक्ष, 739), चंद्रकांत नारायण साळवी (अपक्ष, 308), नंदू संभाजी मोरे (अपक्ष, 673) आणि नोटा 1717.
मतमोजणी केंद्रापासून अर्धा चौरस किमी परिसरातील वाहतूक बंद करुन बॅरिकेडस् लावण्यात आले होते. मतमोजणी केंद्राच्रा परिसरात जिल्हा पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकारी, कमचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील, प्रसाद काटकर, सुनील धायगुडे व कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत झाली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्यात तत्परता दाखविली नाही. त्यामुळे पहिल्या चार फेऱ्यांपर्यंत कसलीही माहिती पत्रकार अथवा मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली नाही. याविषयी नाराजी व्यक्त झाल्यानंतर सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.
आ. चव्हाण यांचे मताधिक्य वाढत जाईल तसा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजेगट समर्थकांचा उत्साह वाढत होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि शरद पवार, रामराजे, रघुनाथराजे, संजीवराजे यांचा जयघोष होत होता.
शिवाजीराज जगताप यांनी आ. चव्हाण यांच्या विजयाची घोषणा करताच शहरातील चौकाचौकात व ग्रामीण भागात फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राज्यात असलेली भाजपची लाट, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटणमध्ये मिळालेली आघाडी पाहता विधानसभा निवडणूक रामराजे यांच्या गटाला कठीण जाणार, अशी चर्चा होती. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये जात असताना रामराजे व त्यांच्या समर्थकांमध्येही काही काळ चलबिचल होती; परंतु सर्वांशी चर्चा करून रामराजे यांनी राष्ट्रवादी आणि दीपक चव्हाण हे समीकरण न बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांनी आ. चव्हाण यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी जीवाचे रान केले. त्यामुळेच आ. चव्हाण यांचा विजय सुकर झाला.
विजयानंतर रामराजे यांच्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती. आ. चव्हाण, रघुनाथराजे, संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, ऍड. अनिकेतराजे, विश्वजितराजे, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सत्यजितसिंहराजे, पंचायत समिती सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, फलटणच्या नगराध्यक्ष सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार उपस्थित होते.