नेवासे -मुळा धरणातून शेतीसाठी सध्या आवर्तन चालू असून, उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन एप्रिल आणि मे महिन्यांत सलग दोन रोटेशन एकत्र करून शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसाठी कालव्यातून आवर्तन सुरू ठेवल्यामुळे नेवासे तालुक्यातील सर्वच भागातील शेतीचे नंदवन झाले आहे. पाणीदार नामदार शंकरराव गडाख यांच्यामुळे नेवासे तालुक्यात चोहीकडे ऐन उन्हाळ्यात पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायस मिळत आहे.
सलग दोन रोटेशन एकत्र सोडण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडला असून, उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे शेतातील पिके उन्हाच्या तीव्रतेमुळे जाळण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. मात्र ना. गडाख यांचे योग्य नियोजन व अधिकाऱ्यांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात व टेलच्या भागात पाणी पोहचल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
ना. गडाख यांनी राजकारण बाजूला सारत पाटपाण्याच्या बाबतीत कठोर भूमिका घेत, शेतकऱ्यांच्या पिकांना पाटाचे पाणी कधीच कमी पडू देणार नाही, अशी ठोस भूमिका घेतल्याचे सध्याच्या तालुक्यातील हिरव्यागार शेती वरून दिसून येत आहे. सलग दोन रोटेशन एकत्र केल्यामुळे शेतकऱ्याच्या विहिरी, बोअरवेल व शेतातळी तुडुंब भरली असल्याचे चित्र स्पष्ट तालुक्यात दिसत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पटाचे पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शेतकरी शेतातील सर्व कामे मार्गी लावून पिके जोमात आली आहेत.