राज्यातील सत्तासंघर्षात महाविद्यालयीन निवडणुकीकडे दुर्लक्ष : येणाऱ्या नवीन सरकारकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
पिंपरी – मागील सरकारने महाविद्यालय स्तरावर निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापपर्यंत रखडलेल्या विद्यार्थी निवडणुका यावर्षीही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील सरकारने विधानसभा निवडणुकांचे कारण देत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात प्रमुख पक्षांमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे अद्याप महाविद्यालयीन निवडणुकांना महुर्त लागलेला नाही. आता महाविद्यालयात परीक्षा सुरु होण्यास अवघे काही महिने राहिल्यामुळे, यावर्षीही या निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे, महाविद्यालयीन निवडणुकांसाठी सज्ज झालेल्या विद्यार्थी संघटनाचे सरकार कधी स्थापन होते याकडे तसेच नव्या सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे. नवीन सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.
मागील सरकारने महाविद्यालय स्तरावर पुन्हा निवडणुका सुरु करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे बहुतांश विद्यार्थी संघटनेने स्वागत केले होते. त्यामुळे, राज्यभरातील वेगवेगळ्या भागात कार्यरत असलेल्या विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयात अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. मात्र, मागील सरकारने यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे कारण देत महाविद्यालयीन निवडणुका अचानक पुढे ढकलण्याची घोषणा केली. अचानक झालेल्या या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनाच्या उत्साहावर विरजण पडले होते. त्यावेळी, विविध विद्यार्थी संघटनानी तत्कालीन सरकारच्या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली होती. मात्र तरीही, निर्णयामध्ये बदल झाला नव्हता.
नवीन सरकार सत्तेवर आल्यावर तत्काळ निवडणूक होईल, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनाना होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेचा तिढा लांबला आणि सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. यामुळे, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्राला सुरुवात होऊनही महाविद्यालयीन निवडणुकीविषयी कोणतेही सूतोवाच होऊ शकलेले नाही. त्यामुळे, निवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे.
यामुळे रखडणार निवडणूक
नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरही विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत महाविद्यालयाच्या आवारात दहावी आणि बारावीच्या परिक्षेस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर पाठोपाठ महाविद्यालयीन परीक्षांनाही सुरुवात होईल. त्यामुळे, यावर्षी तरी निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे.