पुणे, दि. 2 -मध्यरात्रीचे अडीच वाजलेले..जिल्हाधिकारी पुलाच्या ठिकाणी येताच “साहेब तुम्ही अजून इथेच’, अशी अनेकांकडून विचारणा करताच “जोपर्यंत सुरक्षिततेमध्ये संपूर्ण काम होत नाही, वाहतूक सुरळीत होत नाही,’ तोपर्यंत मी इथेच आहे. सकाळी वाहतूक सुरू झाल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख निवासी परतले. यावेळी पोलीस, एनएचएआयचे अधिकारी रात्रभर स्पॉटवर थांबवून नियोजन करत होते.
चांदणी चौकातील पुलाचा ब्लास्टचे नियोजन, सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, पुणे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे संजय कदम, इडिफाइसचे अधिकारी यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ब्लास्टनंतर तासाभरात अधिकारी निघून जातील अशी चर्चा होती. मात्र, राडारोडा उलचण्याचे काम कसे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अडीच वाजता आले आणि रात्रभर ते आढावा घेत होते.
डीएम ग्रुपची यंत्रणा होती कार्यान्वित
पुलाच्या ब्लास्टसह येथील खडकही स्फोटकाने फोडण्याचे नियोजन होते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने डीएम ग्रुप यांना हे काम दिले असून, त्यांची यंत्रणा घटनास्थाळी कार्यान्वित होती. मात्र, ऐनवेळी हा स्फोट रद्द करण्यात आला. तर पुलाच्या ब्लास्टनंतर राडारोडा उलचण्यासाठी डीएम ग्रुपचे 12 पोकलेन, 4 जेसीबी 17 हायवा ट्रकने महत्त्वाची भूमिका बजावली.