बारामती(प्रतिनिधी) : बारामती तालुक्यात मौजे सायबांचीवाडी येथे शिवारफेरी अंतर्गत श्रमदानातून उभारलेल्या बांधाची, मुरघास प्रकल्प व तलाव सुशोभीकरण व पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास देवकाते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,पाणी फाऊंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, उपसरपंच प्रमोद जगताप, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शिवारफेरी अंतर्गत केलेली कामे व पाणी फांऊडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करुन ते बैठकीत म्हणाले की, सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन या संस्थेची मदत घेऊन खरोखरच उल्लेखनीय कामे केली आहेत. सध्या वॉटर बजेट प्लस मध्ये असले तरी त्याचे योग्य जल व्यवस्थापन करून त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल व गाव समृध्द होईल. तसेच सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे चांगले काम केले आहे. गावातील ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी असतील त्या प्रशासनाकडून सोडविण्यात येतील. सर्व ग्रामस्थांचे मी अभिनंदन करतो. याबरोबरच समृध्दी गाव योजनेमध्येही भाग घेण्याचे आवाहन करून पाणी फाउंडेशनच्या टीमचेही यापुढे असेच सहकार्य लाभत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी पाणी फांऊडेशनचे प्रतिनिधी म्हणाले की, सन 2018-19 मध्ये गावामध्ये उपलब्ध पाणी साठा 106.77 कोटी लिटर होता आणि प्रत्यक्षात पाण्याची गरज होती 269.92 कोटी लिटरची म्हणजे एकूण 163.15 कोटी लिटरची पाणी कमतरता होती. ज्यावेळी गावाने 2019-20 मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेऊन मशीन व श्रमदानातून झालेल्या 2 कामाच्या माध्यमातून सुमारे 11 कोटी 40 लाख लिटर पाणी साठा तयार झाला. यानंतर उपलब्ध पाणी 425.95 कोटी लिटर आणि पाण्याची गरज 369.78 कोटी लिटर म्हणजेच 56.17 कोटी लिटर जास्तीचे पाणी झाले.