महाबळेश्वर – दिवाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. आज राज्यभरात 8.8 अंशांपर्यंत तापमान खाली आले होते. परभणीमध्ये सर्वात कमी 8.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये तापमान 9.0 अंशापर्यंत खाली उतरले होते. थंडीमुळे कोरोनाची पुन्हा मोठी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरात हिवाळ्याचा चाहूल लागली आहे. नाशिकमध्ये 11.1 डिग्री, परभणी 10.6, परभणी कृषी विद्यापीठ 8.8, पुणे 11.5, सांताक्रूझ 18.4, जळगाव 12.6, बारामती 11.9, औरंगाबाद 13.0, गोंदिया 10.5, नागपूर 12.4 एवढे किमान तापमान नोंदविले गेले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुलाबी थंडीने पहाट उजाडली होती. मात्र, त्यानंतर अचानक तापमान वाढू लागले होते.
राज्याची राजधानी मुंबईचे कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 25 अंशांवर गेले होते. तापमानातील वाढीमुळे ऐन दिवाळीत थंडी गायब झाली होती. मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते 19 अंशांच्या आसपास गेले होते. त्यामुळे गेला आठवडाभर मुंबईत थंडी होती. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली.
या वाढत्या थंडीमुळे सर्वत्र पहाटे धुक्याचे साम्राज्य पहायला मिळत आहे. शाली आणि स्वेटर्ससह सर्वांनी आपले थर्मलवेअर्स कपाटातून बाहेर काढले आहेत. शिवाय सकाळी सूर्योदयानंतरही बराच काळ थंड हवेमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. महाबळेश्वरमध्ये थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची रीघ लागत आहे.