कडाक्याच्या थंडीने देशभरात थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी लोकांचा थंडीमुळे बळी गेला असून, जनावरांनाही असह्य थंडीमुळे जीव गमवावा लागला आहे. उत्तरेकडील राज्यांत पर्यटनावर तर परिणाम झालाच आहे; शिवाय उत्तर प्रदेशसारख्या राज्यात कोट्यवधींच्या संख्येने ब्लॅंकेट्स वाटण्याची वेळ सरकारवर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी शेकोट्यांसाठी स्थानिक प्रशासनाला सरकारकडून रक्कम दिली जात आहे. अनेक शहरांमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून, पुढील आठवड्यातसुद्धा हीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.
देशभरात विशेषतः उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. अनेक दशकांनंतर एवढी कडक थंडी पडल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दिल्लीसारख्या शहरात थंडीने 120 वर्षांचा उच्चांक मोडल्याचे सांगण्यात येत आहे. एक-दोन दिवस नव्हे तर गेल्या आठवड्यापासूनच देशभरातील लोक थंडीने काकडले आहेत. माणसांबरोबरच मुक्या जनावरांनाही कडक थंडीचा प्रचंड त्रास होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक जनावरे दगावल्याच्या बातम्या प्राप्त होत आहेत. देशभरात थंडीने शेकडो बळी घेतले असून, त्यामुळे चिंता वाढली आहे. वस्तुतः थंडीचा हा अतिरेक अनेक वर्षांनी अनुभवायला मिळत असून, पठारी प्रदेशांमध्येही प्रचंड प्रमाणात थंडी पडल्याने लोक गारठले आहेत. 27 डिसेंबर 2019 या दिवसाची नोंद हवामान विभागाने या हंगामातील देशाच्या अनेक भागांमधील सर्वांत थंड दिवस म्हणून केली आहे. थंडीचा उच्चांक मोडणाऱ्या विभागांमध्ये दिल्लीचा आणि दक्षिणेकडील काही राज्यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत तर अनेक ठिकाणी पारा शून्यावर पोहोचला होता. लोधी रोडसारख्या विभागातही नीचांकी तापमान नोंदविले गेले. अहमदाबाद, पाटणा, लखनौ आदी शहरांत कमी-अधिक फरकाने हीच स्थिती अनुभवायला मिळत आहे. अनेक ठिकाणी थंडीने गारठलेले लोक घरातून बाहेरच पडेनासे झाले आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच थंडीने बेजार करून टाकले आहे.
थंडीमुळे आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचे दिसून आले असून, थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देत आहेत. वाढत्या थंडीमुळे देशाच्या अनेक शहरांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाने शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नागपूरसारख्या शहरांमध्ये सामान्यतः एवढी थंडी कधीच नसते. परंतु यावर्षी तेथील लोकही थंडीने कुडकुडत आहेत. वाढत्या थंडीचा संबंध हवामानशास्त्र विभागाने वातावरणातील बदलांशी जोडला आहे. पर्यावरणतज्ज्ञही त्यांच्या मताला दुजोरा देत आहेत. वस्तुतः पृथ्वीवर जलवायू परिवर्तन झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम आपल्या समोर एका पाठोपाठ एक येत आहेत. सर्वच ऋतू तीव्र होत चालले आहेत. पर्यावरण अभ्यासकांची मते यापूर्वी गांभीर्याने घेतली जात नव्हती; मात्र समोर दुष्परिणाम दिसू लागल्याने लोक आता सावध झाले आहेत. वातावरण बदलांमुळे घडणाऱ्या अतिरेकी नैसर्गिक घटनांची ताजी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. जगाच्या अनेक भागांमधून नैसर्गिक आपत्तींच्या बातम्या येण्याचे प्रमाण आता बरेच वाढले आहे. भूस्खलन किंवा जमिनीला भेगा पडणे, पाणी असलेल्या प्रदेशांत अचानक दुष्काळ पडणे, जंगले वाळून जाणे, वन्यजीव अचानक गायब होणे, अंटार्क्टिका आणि ग्रीनलॅंडमधील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळणे, समुद्राचा जलस्तर वाढणे या अशा घटना आहेत, ज्या भविष्यात आपल्याला आत्यंतिक धोका असल्याचे संकेत देतात. थंडीची तीव्रता ज्या गतीने देशभरात वाढत आहे, त्यापासून सुटका होण्याची चिन्हे नजीकच्या दिवसांत दिसत नाहीत.
पर्यावरण संवर्धनाच्या विषयात केंद्र आणि राज्यसरकारांकडून कागदोपत्री घोषणा भरपूर केल्या जातात; परंतु अंमलबजावणी नसल्यामुळे या उपाययोजना कुचकामी ठरतात. हवामान बदलाच्या आणि जलवायू परिवर्तनाच्या विषयात जगभरातील सरकारांनी नव्याने विचारविनिमय सुरू करणे ही तातडीची गरज आहे. याविषयी होणाऱ्या चर्चा आणि परिषदांमध्ये प्रामाणिकपणा असायला हवा. परंतु व्यापारी शक्तींपुढे सरकारे नमते घेतात आणि ऋतू अतिरेकी बनत चालल्याचा फायदाही व्यापारी वृत्तीच घेतात. सध्या वाढत चाललेल्या थंडीचा फायदा घेऊन विद्युत उपकरणांच्या विक्रीत वाढ घडवून आणली जात आहे. जेवढी कडक थंडी पडत आहे, तेवढ्याच वेगाने बाजारात हिटरची विक्री वाढत चालली आहे. मोठी शहरे असोत वा लहान गावे असोत, सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक हिटर धूमधडाक्यात विकले जात आहेत. हिटरला यापूर्वी फारशी मागणी नव्हती; मात्र ती याच वर्षी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी कबुली काही दुकानदार स्वतः देतात. यावर्षी देशात दररोज शेकडोंच्या संख्येने हिटर विकले जात आहेत.
उत्तर भारतातील डोंगराळ विभागात सातत्याने होत असलेली हिमवृष्टी हे देशातील वाढत्या थंडीचे प्रमुख कारण आहे. हिमवर्षाव आणि थंडीच्या लाटेमुळे पठारी प्रदेशही थंडीच्या तडाख्यात सापडले आहेत. उत्तराखंड या डोंगराळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून सलग हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथे सर्वाधिक थंडी आहे. काश्मीरमध्ये तर थंडीमुळे पर्यटकही जाईनासे झाले आहेत. वस्तुतः काश्मीरमध्ये थंडीच्या दिवसांत सर्वाधिक पर्यटक जातात आणि हिमवृष्टीचा आनंद लुटतात. परंतु यावेळची थंडी कडाक्याची असल्यामुळे पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरविली आहे. काश्मीरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या सरोवरांचेही बर्फात रूपांतर झाले आहे. पाण्यातून नौका चालणे बंद झाले आहे. किमान तापमान शून्याच्याही कितीतरी अंश खाली उतरले आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता हवामान खात्याचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले आहे की, कडाक्याच्या थंडीची ही परिस्थिती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही कायम राहील.
सध्या कडाक्याच्या थंडीने त्रस्त झालेले लोक घरासमोर शेकोट्या पेटवू लागले आहेत. दिल्ली-राष्ट्रीय राजधानी विभागात शेकोट्या पेटविण्यावर बंदी आहे. परंतु तरीही लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी नाइलाजाने नियम मोडून शेकोट्या पेटवत आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये तर प्रशासनानेच शेकोट्यांची व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. तापमान प्रचंड प्रमाणात उतरल्यामुळे तसेच थंड वारे वाहत असल्याने सर्वांत जास्त हाल गोरगरिबांचे आणि झोपडीत राहणाऱ्यांचे होत आहेत. बेघरांची तर परिस्थिती अत्यंत हालाखीची बनली आहे. थंडीपासून जीव वाचविणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट बनले आहे. काही शहरांमध्ये आधारगृहे उभारली जातात; परंतु ती केवळ नावालाच असतात. त्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी फारशा सोयीसुविधा नसतात. त्यामुळे अशा आधारगृहांमध्ये राहणाऱ्यांची परिस्थिती कठीण होऊन जाते. उत्तर प्रदेशात तर सरकारने कोट्यवधी रुपयांची ब्लॅंकेट वाटायला सुरुवात केली आहे.
गरिबांना थंडीपासून वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनांना ब्लॅंकेट आणि शेकोट्या पेटविण्यासाठी सरकारकडून पैसे पुरविण्यात येत आहेत. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत सार्वजनिक ठिकाणी शेकोट्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. लोक आपल्या पातळीवरही थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. यकृताचे विकार असणारे रुग्ण तसेच दम्याच्या रुग्णांचे कडाक्याच्या थंडीमुळे अधिक हाल होत आहेत. मद्यशौकीन थंडीचे कारण सांगून मद्यपानात वाढ करीत असले, तरी अतिथंडीत मद्यपान घातक असते, असे डॉक्टर मंडळींचे म्हणणे आहे. थंडीत अतिगोड खाऊ नये, असाही सल्ला डॉक्टर देत आहेत. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना थंडीमुळे अधिक त्रास होत असल्याचे चित्र आहे. थंडीपासून लहान मुलांचा आणि वृद्धांचा बचाव करणे हाच योग्य उपाय असतो.
प्रा. रंगनाथ कोकणे