पाटणला पूर ओसरला; जनजीवन पूर्वपदावर
पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. गुरूवारी सायंकाळ पासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे धरणाचे दरवाजे 8 फुटांवर करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळ पासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कोयना धरणाचे दरवाजे एक फुटानेवर उचलून 9 फूटांवर स्थिर करण्यात आले असून धरणातून 77 हजार 387 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणाचा पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पाणलोट क्षेत्रातून धरणात सुमारे 89 हजार 386 क्युसेकची आवक अद्यापही सुरू आहे. शुक्रवार सकाळ पासून पावसाचा जोर थोडा वाढला आहे. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे ओढे-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या ओढ्यानाल्यांचे पाणी कोयना धरणात येत असल्याने धरणातील पाणी पातळी वाढत आहे.
पाटण सावरतंय
गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाटण शहारासह तालुक्यातील मल्हारपेठ पाटण विभागात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे दुकांनासह घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळ पासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दुकानदारांनी स्वच्छता मोहीम राबविली असून पूरग्रस्तांनी घरे स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी पूरग्रस्तांना पाटण शहारातील दानशूर व्यक्तीनी ब्लॅंकेट तसेच संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले तर सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.